पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप मैदानात! हिंगोलीत थेट ‘जनता दरबार’; नागरिकांच्या समस्यांवर ऑन-द-स्पॉट तोडगा
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप मैदानात! हिंगोलीत थेट ‘जनता दरबार’; नागरिकांच्या समस्यांवर ऑन-द-स्पॉट तोडगा

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण
हिंगोली:
नागरिक आणि पोलीस प्रशासन यातील अंतर कमी करत कायदा-सुव्यवस्थेचा धाक अधिक बळकट करण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक (IGP) मा. श्री. शहाजी उमाप यांनी आज हिंगोली जिल्ह्याचा वादळी दौरा केला. केवळ औपचारिक बैठका न घेता, त्यांनी थेट जनतेच्या मध्यभागी जाऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
जनतेच्या तक्रारी ऐकून अधिकारी ‘ॲक्शन मोड’मध्ये!
दौऱ्यादरम्यान आयोजित संवाद कार्यक्रमात हिंगोलीकर नागरिकांनी आपल्या विविध अडचणी, स्थानिक समस्या आणि सुरक्षेशी संबंधित प्रश्न विशेष पोलीस महानिरीक्षकांसमोर मांडले. श्री. शहाजी उमाप यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे अत्यंत शांततेने आणि गांभीर्याने ऐकून घेतले. अनेक संवेदनशील आणि तातडीच्या समस्यांवर त्यांनी ‘ऑन-द-स्पॉट’ निर्णय घेत उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे कडक निर्देश दिले.
विशेष पोलीस महानिरीक्षकांचे प्रमुख आदेश
तक्रारींची तातडीने दखल पोलीस ठाण्यात येणाऱ्या सामान्य नागरिकाला न्याय मिळालाच पाहिजे. तक्रारींवर विनाविलंब कारवाई करा.
महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा रस्ते, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवा.
गुन्हेगारीवर वचक अवैध धंदे आणि टवाळखोरी करणाऱ्यांवर कठोर कायद्याचा बडगा उचला.
“जनतेचा विश्वास हीच आमची ताकद!”
“पोलीस प्रशासन हे नागरिकांच्या सेवेसाठी आणि रक्षणासाठी बांधील आहे. सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांबद्दल विश्वासाची भावना आणि गुन्हेगारांच्या मनात वचक निर्माण करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असा सज्जड इशाराही मा. श्री. शहाजी उमाप यांनी यावेळी दिला.
पोलीस महानिरीक्षकांच्या या आक्रमक आणि संवेदनशील कार्यपद्धतीमुळे हिंगोलीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून, स्थानिक प्रशासनात मोठा हडकंप उडाला आहे.

