महिला नेतृत्वाचा सन्मान हीच खरी लोकशाही आणि महाराष्ट्राची संस्कृती: आमदार राजू नवघरे
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

महिला नेतृत्वाचा सन्मान हीच खरी लोकशाही आणि महाराष्ट्राची संस्कृती: आमदार राजू नवघरे
लोकमंच टाईम्स:
वसमत:
“राजकारणात विचारांचे मतभेद असणे, धोरण आणि निर्णयांवर संयमी व वैचारिक टीका होणे हे लोकशाहीत स्वाभाविक आहे. परंतु वैयक्तिक पातळीवर टीका करून महिला नेतृत्वावर चिखलफेक करणे हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला आणि लोकशाही मूल्यांना शोभणारे नाही,” असे प्रतिपादन वसमत मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर होणाऱ्या वैयक्तिक टीकेचा तीव्र निषेध व्यक्त करत आमदार नवघरे यांनी स्पष्ट केले की, अजितदादांच्या निधनानंतर ओढावलेल्या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत सुनेत्रावहिनी पवार यांनी अत्यंत धैर्याने पुढाकार घेतला आहे. त्यांनी पक्षाची जबाबदारी, जनतेच्या अपेक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार, प्रशासकीय कामे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या लीलया पेलत जनसेवेचा मार्ग निवडला आहे. या संकटाच्या काळात त्यांनी दाखवलेले संयमी नेतृत्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
“राजकारणात महिला कोणत्याही पक्षाची असो, तिच्या कर्तृत्वाचा आणि स्वाभिमानाचा आदर राखणे हीच महाराष्ट्राची खरी राजकीय संस्कृती आहे. त्यांच्या कामाचे राजकीय मूल्यांकन जरूर व्हावे; मात्र वैयक्तिक टीका करून महिला नेतृत्वाला लक्ष्य करणे अजिबात योग्य नाही,” असे आमदार राजू नवघरे यांनी आपल्या विरोधकांचाही सन्मान करणारी महाराष्ट्राची हीच समृद्ध परंपरा जपण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

