पावसाची दडी; वसमतसह हिंगोली जिल्ह्यात शेतकरी संकटात पिके वाळू लागल्याने बळीराजा चिंताग्रस्त; बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा होण्याची शक्यता
लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण

पावसाची दडी; वसमतसह हिंगोली जिल्ह्यात शेतकरी संकटात
पिके वाळू लागल्याने बळीराजा चिंताग्रस्त; बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा होण्याची शक्यता
लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण

वसमत:
वसमत तालुक्यासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. वेळेवर पाऊस न पडल्याने शेतातील उभी पिके पाण्याअभावी वाळू लागली असून, हाताशी आलेले पीक वाया जाण्याची गंभीर भीती निर्माण झाली आहे.
दरवर्षी शेतकरी बांधव बैलपोळा हा सण अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करतात. मात्र, यंदा पावसाअभावी निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे पोळ्यासह आगामी सर्वच सण-उत्सव अगदी साधेपणाने साजरे करावे लागतील, असे चित्र दिसून येत आहे. शेतीचे होणारे नुकसान आणि वाढत्या चिंतेमुळे बळीराजाचे मनोबल खचले आहे.
येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावल्यास वाळणाऱ्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल आणि शेतकऱ्यांना थोडा धीर मिळेल. सध्या तरी पावसाच्या प्रतिक्षेत असणारा शेतकरी निसर्गाच्या या अवकृपेमुळे मोठ्या संकटाचा सामना करत आहे.
(छाया: नागेश चव्हाण, वसमत)

